आद्य
`लोककवि' संत नामदेव
" श्रवणं कीर्तन विष्णो स्मरणं पादसेवनं ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मानिवेदनं ॥ "
कीर्तन म्हणजे नामसंकिर्तन. हा नामभक्तीचा आविष्कार आहे. आणि सर्वसामान्यांसाठी
भक्तीचा हाच प्रकार सुलभ आहे. संतनामदेवाने कीर्तनाच्या माध्यामातून
नामभक्तीचा प्रसार केला. म्हणून भागवत संप्रदायात त्याची ` भक्तराज
', ` भक्तशिरोमणी ' अशी ख्याती झाली. सांप्रदायिकांचे श्रध्दास्थान
म्हणून त्याला मान्यता मिळाली. नामभक्ती ही प्रेमरसाने ओतप्रोत भरलेली
म्हणून नामभक्ती म्हणजे प्रेमभक्ती, आणि या प्रेमभक्तीच प्रणेता
संतनामदेव. इतक्या विविध उपाधींनी युक्त असूनही संत नामदेव उपेक्षित
राहीला. ज्ञानेश्वरांचे व्यक्तिमत्त्व बहुविध होते. संत तुकाराम
साधकावस्थेतून सिध्दावंस्थेपर्यंत पोचला. जगाला काही ` नीत द्यावी
' म्हणून ` उपकारापुरता उरला ` धर्माचे पालन, अन् ` पाखंडाचे खंडण
' करीत करीत त्याने ` वैष्णव धर्मा'चा प्रसार केला. ` रात्रंदिन युध्दाच्या
प्रसंगाला ' तोंड देत देत शूद्र असूनही ` वेदांवर आपलाच अधिकार आहे,'
अशी ग्वाही देत तुकारामाने वैष्णवांना भक्तिमार्गातील ` झुंझार 'बनविले.
तुकारामाला हे करणे शक्य झाले कारण संत नामदेवाने नामभक्तीच्या प्रसाराव्दारे
तुकारामाच्या कार्याची भूमी तयार करून ठेवली होती. संत एकनाथ हे समाजोध्दारक
होते तसेच समन्वयवादी होते. वारकरी पंथाबरोबर, दत्तसंप्रदाय रूढ झालेला
होता. कर्मठ ब्राह्मणवादी पंडितांची परंपरा पुन: बळ धरु लागली होती.
आणि जित राष्ट्रावर जेत्या राष्ट्राच्या संस्कृतीचा प्रभाव पडतोच.
या न्यायाने यावानी संस्कृतीचे आक्रमण झालेले होते. अशा स्थितीत समाजोध्दाराची
अन् समन्वयाची निकड एकनाथानी ओळ्खली आणि ` भागवत ' ग्रंथ भाष्यरुपाने
मराठीत आणला. भगवद्भक्तीचे तत्त्वज्ञान पूर्ण केले. श्रीकृष्णाने
उपदेशाच्या माध्यामातून दोनदा भक्तितत्त्वज्ञान सांगितले. ` भागवता'त
उध्दवाला अन् `भगवद्तीते 'त अर्जुनाला ' ज्ञानेश्वरांनी गीतेवर
भाष्य केले. एकनाथांनी भागवतावर भाष्य केले. म्हणून चारही संतांना
एका उक्तीत ओवले गेले.
` ज्ञान्याचा एका अन् नाम्याचा तुका ।'
ज्ञानेश्वरांचे कार्य एकनाथांनी पूर्ण केले. अन् नामदेवाचे कार्य
तुकारामाने पूर्ण केले. पाया आणि कळसाचे स्थान अथवा महत्त्व अनुक्रमे
ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांना मिळाले आणि विनोबा भावे यांनी म्हटल्याप्रमाणे
` ज्ञानबा-तुकाराम ' हा मध्यमपदलोपी समास रुढ झाला. मध्यमपदे लोप पावतात
अन् प्रथम अन् अंतिम पद प्रधान मानले जातात. एका अभंगात या चारही
संताच्या कर्तृत्वाचे सारतत्त्व सांगितले. तो अभंग असा-। संतकृपा झाली
। इमारत फळा आली
। ज्ञानदेवे रचिला पाया । उभारले देवालया ।
नामा तयाचा किंकर । तेणे केलासे विस्तार ।
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारिला भागवत । भजन करा सावकाश । तुका झालासे
कळस ॥
केव्हातरी या अभंगाचा संक्षेप कोणी तरी केला अन् ही उक्ती रुढ झाली.
" ज्ञानदेवे रचिला पाया । कळस शोभे वरी तुकयाचा । " नामदेवाकडे
मात्र सदैव आली ती ` किंकराचि ' भूमिका आणि प्रचारकाची भूमिका, पण
नामदेवाने या भूमिका नम्रपणे स्वीकारल्या अन् श्रध्दापूर्वक अखंडपणे
पार पाडल्या.
वास्तविक पाहता पाहता संत नामदेवाचे कार्य इतर संतांपेक्षा वेगळे आहे,
आणि अनन्यसाधारणही आहे. भक्तीचा प्रसार करीत करीत नामदेव थेट पंजाबापर्यंत
पोचले. तेथे वीस एकवीस वर्षे त्याचे वास्तव्य होते. यापूर्वी म्हणजे
नामदेवापूर्वी पंजाबात पोचला होता तो ज्ञानेश्वरापूर्वी उदयाला आलेला
चक्रधरस्वामींचा महानुभव पंथ. पण ऐतिहासिक पुरावे असे आहेत की हा पंथ
नामदेवानंतर पंजाबात पोचला. महाराष्ट्रात भागवतपंथाचा उदय झाला अन्
महानुभाव पंथाची पीछेहाट झाली. इस्लामी संस्कृतीचे आक्रमण झाले तरी
भागवतपंथाने आपल्या सांप्रदायिक कार्यात तडजोड केली नाही. पंथाचे संरक्षण
करण्यासाठी महानुभावांनी तडजोडी केल्या. त्यांच्या पीछेहाटीला अनेक
कारणे आहेत. पंथात फाटाफूट झाली. पंथाच्या तेरा शाखा झाल्या. सर्वत्र
विखुरल्या. त्यातले काही पंथीय उत्तरेकडे गेले असावेत. महानुभव पंथाचे
संस्थापक चक्रधरस्वामींनी ` उत्तर पंथे गमन केल्याचा ' उल्लेख आढळतो.
मात्र पंजाबात त्यांनी पंथ स्थापन केल्याचा उल्लेख नाही. म्हणून भागवत
पंथात फाटाफुट झाली नाही. म्हणून पंजाबापर्यंत संत नामदेवच आधी पोचला.
भागवत पंथात फाटाफूट झाली नाही. हा पंथ एकसंघ राहिला. कारण भक्ति
तत्त्वज्ञानाने तो एकसंघ बांधला गेला होता. त्याचे बहुतांशी श्रेय
संत नामदेवाकडेच जाते.
संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये समाधि घेतली. त्यानंतर एक महिन्यात
सोपान, सहा महिन्यात मुक्ताबाई व एक महिन्याने निवृत्तिनाथ समाधिस्थ
झाले. आठ महिन्यात हे सगळे घडले याला संत नामदेव साक्षी होते. या प्रसंगावरच
तर त्याने ` समाधीचे अभंग ' लिहिले. शेवटी नामदेवाने उद्गार काढले
ते असे-
` आता ऐसे कोणी होणे नाही '
ज्ञानेश्वरांची भावंडे समाधिस्थ झाल्यानंतर नामदेव विमनस्क झाला.
त्या भावंडाशी त्याचे आत्मीय नाते जडले होते. त्याला एकाकीपण जाणवायला
लागले अन् मग तो ` उत्तरपंथे ' परिभ्रमणास प्रवृत्त झाला.
Next
Page
|